Thursday, 26 March 2009

दुष्काळ

करपलेल्या गवताची
आटलेल्या विहिरीची
तळ शोधणा-या धरणांची
ही आतडे पिळवटणारी गाथा;
हंगामाविषयी उच्चारु नको शब्द
गर्भारते उद्याची काळजी
......
रानातून उपाशीपोटी आलेल्या गायींचे
व्याकूळ वासरांचे हंबरणे असेच राहणार रात्रभर
तुझ्या डोळ्यांत निद्रेची पालखी
येण्याच्या वाटा गजबजल्या आक्रोशाने
......
घरे उदासवाणी कळा पांघरून
वस्त्या प्रश्नांकित काळोखात बुडाल्या खोल
आहे रानाला वेढून भयावह उदासी
गेल्या धुकाळून रानवाटा
......
खिन्न मनात धास्तीची पेरणी
अस्तित्वाभोवती काळजीची गवसणी
बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा निनादही
आताशा झालाय नकोसा
......
सांजप्रहरी टेकडीवरल्या
मंदिराताल्या प्रार्थनेचे स्वर
भैरवीशी सलगी करून
पारावरच्या म्हाता-याकुता-यांच्या चर्चा गप्पा
क्षीण डोळ्यांत भाकरीची आकृती
......
पेवात उन्दरांचा धुडगूस पोटात भुकेचा आगडोंब
ये रे ये रे पावसा
म्हणणा-या लहानग्यांचा
उत्साह भीतीत विरलेला
......
शेताच्या बांधावर बसून
एक हडकुळा देह
न्याहाळतो विस्तारलेले भकासपण
आठवतो शिवाराची गतश्रीमंती
......

-अजीम नवाज राही
(व्यवहाराचा काळा घोडा)

No comments: